ब्रिटिश पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर स्वतंत्र भारताचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय संविधानाची आवश्यकता होती. या कार्यासाठी घटना सभेची स्थापना करण्यात आली.
सतत दोन वर्षांहून अधिक काळ सविस्तर चर्चा व विचार केल्यानंतर तेव्हाचे केंद्रीय कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेचा मसुदा तयार केला व तो देशाला सादर केला.
२६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना अंमलात आली. म्हणून हा प्रजासत्ताक दिन! या दिवशी सकाळी दिल्लीत राजपथावर ध्वजवंदन व संचलन होते. देशाचे राष्ट्रपती मानवंदना स्वीकारतात.
२६ जानेवारी १९३० रोजी लाहोर काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव संमत केला. त्याचे स्मरण म्हणून याच दिवशी राज्यघटनेची अंमलबजावणी करण्याचे ठरले व जगातील सर्वांत मोठी लोकशाही अस्तित्वात आली.
या राज्यघटनेत परिस्थितीनुसार १००हून अधिक दुरुस्त्या झाल्या खऱ्या; पण घटनेचा मूळ ढाचा कायम राहिला, हे महत्त्वाचे. या संविधानानुसार संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द झाले व खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करून त्या सरकारने ताब्यात घेतल्या.
या संविधानानुसारच १९७५मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लादण्यात आली होती. यातील ३७० कलमानुसार काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा गेल्या वर्षी काढून घेण्यात आला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार व लष्करी आणि पोलिस पुरस्कार जाहीर होतात.
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
- भारतकुमार राऊत